Home Uncategorized ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे सहा.संचालकाचे निलबंन मागे घ्या

ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे सहा.संचालकाचे निलबंन मागे घ्या

101
0

ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग संघटनाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याना निवेदन

गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील सर्व ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गाच्या संघटनाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंंत्री,ओबीसी बहुजन कल्याण मंत्री तसेच मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, सचिव ओबीसी बहुजन कल्याण विभाग यांना आज 22 ऑगस्ट रोजी निवेदन सादर करुन ओबीसी विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वसतिगृह सुरु करणाऱ्या सहाय्यक संचालकाचे ओबीसी बहुजन विभागाच्या सचिवाने केलेले निलबंन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदनात ओबीसी अधिकार्यावरील कारवाई मागे न घेतल्यास राज्यातील सर्व ओबीसी संघटना राज्यसरकार व ओबीसी मंत्र्याच्या विरोधात आंदोलनाच मार्ग पत्करणार असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात राज्य सरकार खरंच ओबीसी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करते काय? ओबीसी विद्यार्थी महत्त्वाचे की शासनाचा राजशिष्टाचार? असा प्रश्न सुध्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. नागपूर येथील ओबीसी वसतिगृहाचे उदघाटन 16 ऑगस्ट, 2024 रोजी ओबीसी विद्यार्थ्यांनी केले. यात राजशिष्टाचार पाळला गेला नाही असे कारण दाखवून ओबीसी समाजातील नागपूर येथील सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र भुजाडे यांचे निलबंन राज्य शासनाने केले. तसेच नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री व इतर मागास बहुजन कल्याण मंत्र्यांचा अहंकार संतुष्ट करण्यासाठी प्रवेशित सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्यास सांगितल्याने सध्या ते पात्र विद्यार्थी किरायच्या खोल्यांमध्ये राहत आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे. सहाय्यक संचालकाने केलेले कार्य ओबीसी विद्यार्थी हिताचे असून त्यांची यात कुठलीच चूक नाही. त्यामुळे शासनाने त्वरित राजेंद्र भुजाडे यांना सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण,जिल्हा नागपूर या पदावर पूर्ववत करावे. अन्यथा ओबीसी समाज शांत बसणार नाही. महाराष्ट्रभर ओबीसी आंदोलने होतील याची नोंद शासनाने घ्यावे असे निवेदनात म्हटले आहे. आधी 15 ऑगस्ट, 2023, 15 सप्टेंबर, 15 ऑक्टोंबर, 15 नोव्हेंबर आणि नंतर 28 मार्च 2024 पासून वसतिगृहे सुरू करू अश्या खोट्या घोषणा ओबीसी मंत्रांनी अनेकदा केल्या होत्या. मार्च 2024 मध्ये वसतिगृह सुरू होतील म्हणून नागपूर येथे तीनशेच्या वर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत. परंतु 31 जुलै पर्यंत वस्तीगृह सुरू न झाल्याने विद्यार्थ्याने वस्तीगृहाच्या इमारतीसमोर आंदोलन केले यावर सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर यांनी विद्यार्थ्यांना आस्वस्थ केले होते. 15 ऑगस्ट 2024 पर्यंत वस्तीगृह सुरू होतील आणि त्यासंबंधीचा पत्र सुद्धा विद्यार्थी संघटना आणि शासनाला दिले होते. परंतु 15 ऑगस्टला सुद्धा वस्तीगृह सुरू न झाल्याने 16 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी स्वतःच वस्तीगृहाचे उद्घाटन करून वस्तीगृहात प्रवेश केला. त्याचप्रमाणे गोंदियातील वसतिगृह सुरु न झाल्यास प्रवेशित विद्यार्थ्यासोंबत उद्या त्याठिकाणी प्रवेश करणार असल्याचेही म्हटले आहे. निवेदन देतेवेळी ओबीसी अधिकार मंचेच संयोजक खेमेंद्र कटरे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वराडे, कैलास भेलावे, राजीव ठकरेले, विक्की बघेले, विनोद नाकाडे, सुनिल भोंगाडे, महेंद्र बिसेन, रवी भांडारकर, मुनेश्वर कुकडे, क्रांती बघेले, रवि सपाटे, पप्पू पटले, फनिंद्र बावनकर, रविकुमार पटले, कृष्णा ब्राम्हणकर, इंद्रबोस गंगभोज, डी.गायधने यांच्यासह ओबीसी अधिकार मंच, ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी सेवा संघ, युवा बहुजन मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.