गोंदिया (तिरोडा) : जिल्ह्यात अवैध रेती तस्करी दिवसेंदिवस धोकादायक होत चालली आहे. माया जमविण्याच्या नादात रेती माफिया व त्यांचे साथीदार कशाचीही पर्वा करीत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. आज, दुपारी 3 वाजता सुमारास रेती वाहतूक करीत असलेला टिप्पर अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर झाला. दरम्यान अनियंत्रित टिप्परचे चाक बाहेर निघाला अन् टिप्परने मानवता विद्यालयात धडक दिली. या घटनेत मोठे अनर्थ टळले. परंतु, रेतीची धोकादायक वाहतूक चर्चेत आली आहे. तिरोडा तालुका रेती तस्करीचा केंद्र ठरला आहे. राज्यासह परराज्यात येथील रेती राजरोसपणे वाहतूक केली जात आहे. मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या मशिनच्या माध्यमातून नदीपात्रात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून उपसा केला जात आहे. यामुळे रेती घाट परिसरातील रस्त्यांवर जीवघेणी स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आज, अर्जुनी बोंडराणी येथील रेती घाटावरून रेती भरून टिप्पर क्र.एमएच-36/एए-0845 वाहतुकीसाठी अर्जुनीकडून तिरोडाच्या दिशेने जात होता. भिंत आडवी आल्याने टिप्पर थांबला, अन्यथा मोठा अनर्थ दरम्यान अचानक धावत असलेल्या टिप्परचा एक चाक निघाला. यामुळे टिप्पर चालकाच्या नियंत्रणाबाहेर जावून मानवता विद्यालयाच्या आवारभिंतीवर जावून आदळला. या घटनेत मोठा अनर्थ टळला. भिंत आडवी आल्याने टिप्पर थांबला अन्यथा का झाले असते? याची कल्पना करणेही अवघड जात आहे. एंकदरीत या प्रकाराने अवैध रेती उत्खनन आणि तस्करी दिवसेंदिवस धोकादायक होत चालली. कुणाचीही पर्वा न करता दिवसरात्र रस्त्यावर धावणारे टिप्पर इतर प्रवाशांसाठी यमराज ठरत असल्याची प्रतिक्रिया आता सर्वस्तरावर उमटू लागली आहे. याकडे आतातरी लक्ष देवून रेती तस्करीच्या या जीवघेण्या स्पर्धेवर अंकूश लावावा, अशी मागणीही केली जात आहे.

