Home गोंदिया जिल्हा महिला शेतकरी गटांना ‘कृषि अवजारे बँक’ स्थापन करण्याची सुवर्णसंधी, 5 एप्रिलपर्यंत अर्ज...

महिला शेतकरी गटांना ‘कृषि अवजारे बँक’ स्थापन करण्याची सुवर्णसंधी, 5 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

51
0

गोंदिया, दि.17 : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत प्रकल्प गावांमध्ये गावस्तरावरील ‘कृषि अवजारे बॅंक’ स्थापन करण्यासाठी नोंदणीकृत महिला शेतकरी गटांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात भाडेतत्वावर आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करुन देणे हा आहे. सहभागी होऊ शकणारे गट : या योजनेचा विस्तार पुढील घटकांसाठी करण्यात आला आहे.

महिला शेतकरी गट : प्रकल्प गावातील उमेद (MSRLM) व नविन पुरस्कृत महिला बचतगट तसेच महिला ग्राम संघ यासाठी पात्र आहेत.

आत्मा व इतर गट : जिल्हा आणि तालुका स्तरावरील ‘आत्मा’ अंतर्गत नोंदणीकृत गट आणि इतर महिला शेतकरी गटांनीही यामध्ये सहभागी व्हावे.

शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी : अर्जाची संपूर्ण प्रक्रिया प्रकल्पाच्या FPO-DBT पोर्टलवर राबवली जात असून, शेतकरी उत्पादक कंपन्यांशी संबंधित महिला गटांनाही यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

पात्रता : प्रकल्प गावातील उमेद (MSRLM), नविन पुरस्कृत महिला बचतगट आणि महिला ग्राम संघ या योजनेसाठी पात्र आहेत.

अर्ज केवळ FPO-DBT पोर्टल https://dbtndksp.mahapocra.gov.in यावर ऑनलाईन स्वीकारले जातील. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2026 आहे.

निवड प्रक्रिया : ‘एक गाव एक कृषि औजार बँक’ या तत्त्वानुसार प्रत्येक तालुक्यासाठी लक्ष्य निश्चित करण्यात आला आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त पात्र अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थी गटाची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने केली जाईल. निवड झालेल्या गटाला ग्राम कृषि विकास समितीचे शिफारस पत्र पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असेल. मिळणारी यंत्रसामग्री या बँकेत मुख्य पिकानुसार यंत्रांची निवड केली जाईल.

सर्वसाधारण गावांसाठी- बेडमेकर आणि बियाणे टोकण यंत्र ही प्रामुख्याने बंधनकारक आहे. भात पट्टयातील गावांसाठी- भात पेरणी आणि कापणी यंत्र बंधनकारक आहेत. इतर यंत्र- ट्रॅक्टर चलित फवारणी पंप, फळणी यंत्र, वाईन हार्वेस्टर आणि फळवाटा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली इतर आधुनिक यंत्रे गटाला घेता येतील.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला शेतकरी गटांनी, विशेषत: ‘फार्मर कप’ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा, गोंदिया यांनी केले आहे.